तो सर्वव्यापी आहे असं म्हणतात. खरंच आहे का तसं? कधी कधी तसे अनुभव सुद्धा येतात. आणि मग विश्वास ठेवावा असं वाटतं. आता कालचीच गोष्ट पहा. मी आणि अक्षदा (माझी सौ), आम्ही दोघे दुचाकीवरून गावावरून येत होतो. सध्या कोरोनामुळे रस्ते एकदम मोकळे होते. आम्ही दोघे फार आनंदात होतो. पुढच्या आयुष्याची स्वप्नं रंगवत रंगवत येत होतो. त्या नादात आमच्या गाडीने ने कधी वेग घेतला आम्हाला कळलेच नाही. भिगवण च्या पुलाच्या उतारामुळे बहुतेक असावे, गाडी ताशी ७० ते ७५ च्या वेगात असेल. अचानक बाजूच्या सर्विस रोड वरून एक गाडी इंडिकेटर न दाखवता आत शिरली. मी भानावर आलो आणि लगेच हॉर्न वाजवला. त्या गाडीचालकाने गाडी थांबवली आणि माझ्याकडे पाहून वेगळेच हसला. कोण होता तो? तसा का हसत होता ह्या विचारात न पडता मी त्याच्या पुढे जाऊन डाव्या बाजूने परत गाडी चालवू लागलो. अचानक परत तोच गाडीवाला आमच्या पुढे जाऊ पाहत होता. त्याला वाटही होतीच. तो जरासा पुढे गेला असेल आणि त्याच्या गाडीसमोर कुत्रं आलं. पांढऱ्या रंगाचं, बऱ्यापैकी उंची असणारं, जास्त पोसलेलही नव्हतं आणि जास्त कुपोषितही नव्हतं. पण त्या गाडीवाल्याने त्याचा वेग काही कमी केला नाही. पण ते त्याच्या गाडीला चुकवून माझ्या गाडीसमोर येऊन उभं राहिला आणि मी ही वेगाला आवरू शकलो नाही आणि पुढचं चाक धडकलं त्याला. काय वेदना झाल्या असतील बिचाऱ्याला? जीवच गेला त्याचा, आम्हीही पडलो. भानावर आलो तेंव्हा मी कोलांट्याउड्या खात खात पुढे फरपटत चाललो होतो. थांबलो तेंव्हा पाहिलं तर अक्षदा मागे पडली होती. तीसुद्धा बरेच लांब फरपटत गेली होती. गाडी एका बाजूला पडली होती. कुत्रा शेवटच्या घटका मोजत होतं. आणि तो गाडीवाला कधीच पुढे निघून गेला होता. आम्ही दोघे रक्तबंबाळ झालो होतो कपडे फाटले होते. कुत्रं तर मरुनच पडलं होतं. हृदय दुप्पट वेगाने धडधड करत होतं. नशिबाने मागे कुठली गाडी नव्हती नाहीतर आम्ही दोघेही ह्या .... . हे सगळं झाल्यावर लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेलं. आमच्यावर उपचार झाले. आम्ही घरी पोचलो. आईने आमच्यावरून तुकडा ओवाळून टाकला. आणि म्हणाली कानावरून गेलं. कानावरून गेलं म्हणजे काय तर आपल्यावर आलेला मृत्यू दुसऱ्यावर जाणे.
ह्या सगळ्याचा मी नंतर विचार करत बसलो होतो. कि आमच्या साठी आलेला काळ कुत्र्याला घेऊन गेला. कि कुत्र्यामुळेच सर्व झालं? तो माणूस कोण होता? आणि तो वेगळाच का हसला? तोच काळ होता का? मग जर तो काळ असेल तर त्या कुत्र्याचा मृत्यू माझ्याकडून का करवून घेतला? आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मग ह्या सगळ्यामागे देवाची काय योजना असेल? काय चांगलं करायचं होतं त्याला? की जीव वाचला हेच चांगलं झालं होतं? माहित नाही. त्याच्या योजना तोच जाणे. आपण विचारही करू शकत नाही अस काहीतरी त्याला घडवून आणायचं असेल. आपण ह्याचा जास्त विचार करायचा नाही हे मी ठरवलंय आता. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप चांगला प्लॅन करून ठेवलं असेल. तो सर्वव्यापी आहे हेच खरं.
- कौस्तुभ एकबोटे